अन्नातून 9 जणांना विषबाधा! उपचारासाठी भाभा रुग्णालयात केले दाखल

प प्रतिनिधी
मुंबई
खार दांडा येथील त्रिमूर्ती हाऊसिंग सोसायटीमध्ये शनिवारी अन्नातून विषबाधा झाली. विषबाधा झालेल्या 9 जणांना पालिकेच्या वांद्रे येथील भाभा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी दोन जणांनी पालिकेच्या रुग्णालयात उपचार घेण्यास नकार दिला. सात जणांवर उपचार सुरू असल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने दिली.
दहिसर येथे वाढदिवसाचा केक खाल्याने 30 हुन अधिक लोकांना विषबाधा झाली होती. हे प्रकरण ताजे असतानाच खार दांडा येथे अन्नातून विषबाधा झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. खार पश्‍चिम, खारदांडा, न्यू गुलाब नगर येथील त्रिमूर्ती हाऊसिंग सोसायटीमधील 9 जणांना वांद्रे येथील भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी दोन जणांनी महापालिकेच्या रुग्णालयात उपचार घेण्यास नकार दिला आहे. विषबाधा नेमकी कशामुळे झाली याचा तपास रुग्णालय प्रशासन आणि पोलिसांकडून सुरू आहे. रेशम सोनगरे,  (25 ) राधा कारंडे (40 ), उर्मिला कारंडे (20 ), भुमिका कारंडे (14), गितीका सोंगरे (4 ), यातीक भगत (18 ), योगिता भगत (43 ) या सात जणांवर भाभा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.