गणेश नाईकांच्या गडाला भाजप नगरसेवकांचा गट अजित पवारांच्या भेटीला ६ नगरसेवक राष्ट्रवादीच्या, तर ४ शिवसेनेच्या वाटेवर?
| प्रतिनिधी नवी मुंबई माजी मंत्री गणेश नाईक यांच्या गटाला पुन्हा एकदा झटका बसण्याची शक्यता आहे. त्यांच्या गटाचे ६ नगरसेवक पक्ष सोडण्याच तयारीत आहेत. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली आहे. येत्या एप्रिलमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका येत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर नवी मुंबईतील गणेश नाईक यांच्या वर्चस्वाला धक्का देण्यासाठी नुकताच महाविकास आघाडीच्या कार्यकत्यांचा मेळावा घेतला होता. नाईक गटाचे (भाजपचे) ४ नगरसेवक शिवसेनेच्या वाटेवर असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली होती. आत्ता पुन्हा एक झटका नाईक गटाला बसणार आहे. कारण गणेश नाईक यांच्या सोबत भाजपवासी झालेले नगरसेवक घरवापसीच्या तयारीत आहेत. याच अनुषंगाने या ६ नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली असल्याची माहिती मिळाली आहे.गणेश नाईक यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता, तेव्हा ५३ नगरसेवकांनी नाईकांसोबत भाजपप्रवेश केला होता. मात्र, नवी मुंबई महापालिकेची निवडणूक जवळ आली असतानाच नवी मुंबईच्या तुर्भेमधील भाजपचे ४ नगरसेवक शिवसेनेच्या वाटेवर असल्याची माहिती काही दिवसापूर्वी मिळाली होती. सुरेश कुलकर्णी, राधा कुलकर्णी, संगीता वास्कर, मुद्रिका गवळी या चार भाजपच्या नगरसेवकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. तसेच सुरेश कुलकर्णी यांनी आयोजित केलेल्या भव्य हळदीकुंकू समारंभासाठी ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनीही उपस्थिती लावली होती. यावेळी एकनाथ शिंदे यांनी सुरेश कुलकर्णी यांचे कौतुकही केले व तुर्भे मधील झोडपट्टीला एसआरए लागू करण्याबाबत पावले उचलली जातील असेही आश्वासन दिले होते. अगोदर चार नगरसेवक शिवसेनेत जात असल्याचा धक्का पचवीत असतानाच नाईक गटाला पुन्हा एक धक्का ऐन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बसणार आहे. कारण संदीप सुतार, सलोजा सुतार, शुभांगी पाटील, शशिकला पाटील, चंद्रकांत पाटील व राजू शिंदे या नगरसेवकांनीही नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांची भेट घेतली आहे.