बळकटी देणारे उपक्रम हवे

मुख्यमंत्र्यांनी दिले आराखडा तयार करण्याचे निर्देश



राज्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची अवस्था सुधारण्यासाठी राष्ट्रीय आणि राज्य महामार्ग यांना जोडणाऱ्या ग्रामीण रस्त्यांचा विकास आराखडा तयार करावा, हा आराखडा तयार करताना महत्त्वाच्या रस्त्यांच्या कामांची प्राथमिकता निश्चित करावी अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या.


मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी ग्रामविकास विभागाची आढावा बैठक संपन्न झाली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उद्योग मंत्री सुभाष देसाई, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, राज्यमंत्री अब्दुल सत्तार, विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अरविंद कुमार, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे सचिव प्रवीण किडे, उमेदच्या व्यवस्थापकीय संचालक आर. विमला आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. ग्रामीण रस्त्यांची कामे करताना रस्त्यांचा दर्जा उत्तम राहील याकडे लक्ष केंद्रीत करावे, ज्या कंत्राटदाराला हे काम देण्यात आले आहे, त्यांच्यावर रस्त्यांचीजबाबदारी निश्र्चित केली जावी असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देणाऱ्या उपक्रमांना अधिक गती देण्यात यावी. यामध्ये बचतगटांच्या वस्तूंना व्यापक बाजारपेठ मिळावी यासाठी प्रदर्शनांचे आयोजन आणि कायमस्वरूपी बाजारपेठ मिळेल अशी व्यवस्था विकसित करावी. बचतगटांना ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवर आणण्याचा प्रयत्न करण्यात यावा व तालुकास्तरावरील सक्षम बचतगटांना शिवभोजन योजना राबविण्यासाठी प्रोत्साहित करण्यात यावे अशा सूचनाही त्यांनी दिल्या.


मालमत्तापत्र घरपोच


सात बारा उताऱ्याप्रमाणे ग्रामपंचायतस्तरावर घरपोच मालमत्ता पत्र (प्रॉपर्टी कार्ड) देता येईल का याची विभागाने चाचपणी करावी, शक्य असल्यास अशी व्यवस्था विकसित करावी, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. ग्रामीण तीर्थक्षेत्रे आणि परिसर स्वच्छ राखताना ती पर्यटनाच्यादृष्टीने विकसित व्हावीत, या माध्यमातून रोजगार वाढावा व युवकांच्या हाताला काम मिळावे यासाठी अशा मोठ्या तीर्थक्षेत्रांची जिल्हानिहाय यादी करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.


अधिकाराचे विकेंद्रीकरण । 


ग्रामीण भागातील सत्तेचे व अधिकारांचे विकेंद्रीकरण करण्याची प्रक्रिया काहीशी संथ झाली आहे. त्यास गती देऊन स्थानिक स्वराज्य संस्थांना अधिक सक्षम करण्याची गरज असल्याचे प्रतिपादनही मुख्यमंत्र्यांनी केले.