माझं हिंदुत्व सिद्ध करण्याची गरज नाही उद्धव ठाकरेंची मनसेच्या मोर्चावर खोचक टीका


मुंबई : दुसरीकडे मनसेच्या मोर्चावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खोचक टीका केली आहे. आपल्याला हिंदुत्व सिद्ध करण्याची गरज नाही. शिवसेनेनं कधीही झेंड्याचा रंग बदलला नाही अशी खोचक टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. मरेपर्यंत भगवा सोडणार नसल्याचंही त्यांनी सांगितले. शिवसेना आमदारांची रविवारी सह्याद्री अतिथीगृहावर बैठक पार पडली. यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे. या बैठकीत सीएए आणि एनआरसीबाबत शिवसेना आमदारांना मार्गदर्शन करण्यात आले.
या बैठकीत सीएए आणि एनआरसी संदर्भात सर्व आमदारांना करण्यात मार्गदर्शन आलं. सीएए आणि एनआरसी म्हणजे नेमकं काय आहे हे समजावून सांगितले. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, काही लोकं म्हणत आहेत की, शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सोबत गेल्यानं आम्ही हिंदुत्व सोडले, पण हिंदुत्व आणि भगवा मरेपर्यंत सोडणार नाही, असं ठाकरे म्हणाले.
मला माझं हिंदुत्व सिद्ध करण्याची गरज नाही. कारण ते बाळासाहेबांचे हिंदुत्व आहे. ते शुद्ध आहे. मी माझ्या पक्षाचा झेंडा बदलला नाही, एक माणूस एक झेंडा हे आमचं ठरलेले आहे. जगाला ठाऊक आहे आपलं हिंदुत्व काय आहे, असंही ते म्हणाले. यावेळी मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, समस्या सोडविण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात नियोजन केंद्र उभारलं जाणार आहे. जिल्ह्यातील आमदारांना सोबत घेऊन नियोजन करणार आहोत.