शरद पवारांचं गृहमंत्री अनिल देशमुखांना पत्र,शांततापूर्ण सभेच्या ठिकाणी पोलिसांना बसण्यासाठी व्यवस्थेची मागणी
प्रतिनिधी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे देशाच्या राजकारणातील सर्वात वरिष्ठ नेते आहेत. ५० हून अधिक काळ संसदीय राजकारणात घालवलेल्या शरद पवारांना जे दिसतं, ते इतर राजकारण्यांना सहजासहजी दिसत नाही. शरद पवारांनी नुकतेच गृहमंत्री अनिल देशमुख यांना पत्र पाठवून एक मागणी केली आहे. या मागणीमुळे शरद पवार यांच्यातला संवेदनशील माणसाचे दर्शन राज्यातील सर्वच पोलिसांना झाले आहे. राजकीय पुढाऱ्यांच्या सभा किंवा दौऱ्याप्रसंगी पोलिसांचा मोठा फौजफाटा बंदोबस्ताला लावलेला असतो. मात्र सभा-दौरा संपेपर्यंत हे पोलीस उभेच असतात. या पोलिसांना बसण्यासाठी व्यवस्था करुन देण्याची मागणी पवार यांनी केली आहे.सभा शांततेत सुरू असताना महिला पोलीस कर्मचारी, वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि इतर पोलीस कर्मचाऱ्यांना आवश्यकतेनुसार बसण्यासाठी खुर्ची अथवा आसन उपलब्ध करून देण्याविषयक संयोजकांना मार्गदर्शक सूचना निर्गमित व्हाव्यात आणि पोलीस कर्मचारी, अधिकाऱ्यांना गृहविभागामार्फत तशी मुभा असावी अशी विनंती करणारे पत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना दिले आहे. स्व. गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्टच्या रौप्यमहोत्सवी सांगता समारंभानिमित्त मिरजमधील गुलाबराव पाटील शैक्षणिक संकुलात आयोजित कार्यक्रमात उपस्थितांशी शरद पवार यांनी संवाद साधला. त्यानंतर शरद पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना पत्र दिले आहे. यावेळी राज्यातील मंत्री, अतिमहत्त्वाच्या व्यक्ती यांच्या दौऱ्याप्रसंगी गर्दी नियंत्रण, कायदासुव्यवस्था आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने तैनात असलेल्या पोलिसांच्या प्रश्र्नांकडे आयोजकांचे आणि उपस्थितांचे शरद पवार यांनी लक्ष वेधले. जाहीर सभा वा दौऱ्यांच्या ठिकाणी अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या आगमन व प्रस्थानावेळी पोलीस प्रशासनावर विशेष ताण असतो. इतर वेळी पोलिस कर्मचाऱ्यांना तासनतास तिष्ठत उभे राहावे लागते. केवळ पोलीस कर्मचारीच नाही तर अशा सभाप्रसंगी पोलीस अधीक्षक आणि वरिष्ठ पोलीस अधिकारीदेखील तिष्ठत उभे राहतात. सभेच्या बंदोबस्तावेळी पोलीस कर्मचारी-अधिकारी यांनी तत्पर आणि सज्ज असावयास हवे, मात्र सभा सुरळीत सुरू असताना विशेषत: महिला पोलीस कर्मचाऱ्यांना निष्कारण त्रास सहन करावा लागतो असे मला वाटते. तसेच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी देखील तिष्ठत राहणे मला उचित वाटत नाही असेही पत्रात शरद पवार यांनी म्हटले आहे.