3 हजार ८९४ गिरणी कामगारांना मिळाले हक्काचे घर

घर विकून मुंबईवरचा हक्क गमावू नका मुख्यमंत्र्यांचं गिरणी कामगारांना आवाहन ७० 



प्रतिनिधी मुंबई ___ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज गिरणी कामगारांसाठी म्हाडाच्या ३८९४ सदनिकांची सोडत जाहीर झाली. यामध्ये १७ हजार कामगारांचा समावेश आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात गिरणी कामगारांचे मोठे योगदान आहे. या प्रत्येक गिरणी कामगारास घर देण्यासाठी शासन कटिबद्ध असून एकही गिरणी कामगार बेघर राहणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गिरणी कामगारांना दिली. गिरणी कामगारांनी त्यांना मिळालेली घरे इतरांना विकू नयेत आणि मुंबई बाहेर जाऊ नये, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.


म्हाडाच्या विभागीय घटक असलेल्या मंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे चौथ्या टप्प्यांतर्गत गिरणी कामगार व त्याच्या वारसांसाठी मुंबईच्या मध्यवर्ती भागातील बॉम्बे डाईंग, स्प्रिंग मिल आणि श्रीनिवास मिलच्या जागेवर उभारण्यात आलेल्या ३ हजार ८९४ सदनिकांची सोडत आज वांद्रे येथील म्हाडा मुख्यालयात मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या उपस्थितीत आणि कामगार नेते दत्ता इस्वलकर यांच्या हस्ते काढण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी गृहनिर्माण मंत्री डॉ.जितेंद्र आव्हाड, महापौर किशोरी पेडणेकर, सभापती विनोद घोसाळकर, झोपडपट्टी पुनर्वसनचे सभापती विजय नाहटा, म्हाडाचे उपाध्यक्ष मिलिंद म्हैसकर, माजी राज्यमंत्री सचिन अहिर, नवाकाळच्या संपादिका जयश्री खाडिलकर उपस्थित होते. मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, मी आज भाषण न करता कुटुंबातील प्रमुख म्हणून तुमच्याशी संवाद साधणार आहे. गिरणी कामगारांचे ऋण माझ्यावर आहे आणि ते व्यक्त करण्यासाठी आलो आहे. घर मिळाल्यावर मला आपल्या घरी चहा प्यायला बोलवा, आपल्या घरात आनंदी राहा, घरे विकू नका मुंबईचा हक्क गमावू नका, असेही त्यांनी यावेळी सांगितले.


श्रीनिवास मिल येथील पहिल्या सोडतीमधील विजेते १) कृष्णा काकडे २) शोभना सिंग ३) भगवती सकपाळ मुंबईतील सर्वात उच्चभ्रू ठिकाणी उभारण्यात आलेल्या गृहप्रकल्पातील २२५ चौ फुटांच्या वन बीएचके स्वरुपातील सदनिका अत्याधुनिक सोयीसुविधांनी युक्त आहेत. तसेच आधुनिक काळाची गरज लक्षात घेता वडाळा येथील बॉम्बे डाईंग मिल गृहप्रकल्पाच्या आवारात १५ मजल्यांचे वाहनतळ इमारत (पार्किंग टॉवर) उभारण्यात आले आहे.